Thursday, June 28, 2018

भारतीय संस्कृती आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा!

पुरेसा अभ्यास न करता स्वतःला मॉडर्न भासविण्यासाठी उठ-सूट भारतीय सण- परंपरा यावर (पातळी सोडून) टीका करायची सवय अनेकांना लागलेली आहे.
प्रत्येक गोष्ट फक्त विज्ञानाच्या आधारावरच खरी ठरली पाहिजे हा आग्रह कशाला? आणि तसे करायचे ठरले तर किती गोष्टी विज्ञानाच्या आधारावर खऱ्या ठरतील? विज्ञानाला सुद्धा मर्यादा आहेत हे लक्षात घ्या, आणि सर्वच गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या ठरवायच्या असतील, विज्ञान सांगेल तेच खरे आणि बाकी सर्व खोटे असे मानायचे असेल तर त्यास 'वैज्ञानिक अंधश्रद्धा' म्हणावे लागेल. आपणाला एखादी गोष्ट नाही पटत तर नका करू, पण चुकीची माहिती देऊन दिशाभूल का करताय? चुकीच्या गोष्टींवर टीका करत असाल तर अगदी मान्य, पण योग्य गोष्टी चुकीच्या पद्धतीने समजून घेत असाल तर ते आपले अज्ञान आहे हे समजून घ्या!
योग्य असेल तेथे टीका झालीच पाहिजे, चर्चासुद्धा झाली पाहिजे, नवीन बदल आवश्यक असेल तर करायलाही पाहिजे हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. भारतीय संस्कृतीने कायम बदल स्वीकारला आहे, नाविन्याचा शोध घेतला आहे, आणि सर्व विचारप्रवाहांना सामावून घेऊन सहजीवनाचा आदर्श घालून दिला आहे.
एखादि गोष्ट करून लोकांना बरे वाटत असेल, आनंद मिळत असेल, समाजव्यवस्था चांगली राहत असेल, पर्यावरण वाचवले जात असेल, आणि त्यामुळे कोणाचेही, कसलेही नुकसान होत नसेल तर अशा गोष्टी बिनधास्त करा, जीवनाचा आनंद घ्या! कायमच बुद्धी, विज्ञान, तर्कशास्त्र हे वापरलेच पाहिजे असे नाही. जिथे गरज आहे तिथे जरूर वापरा.

No comments:

Post a Comment